खरे सोने व पाणी दिलेले पितळ
मी काही काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता नाही..पण आकस बुद्धि राजकारण करणार्या नमो भाजपचा विरोधक नक्की आहे ... पण तरीही गुजरात आणि हिमाचलच्या निवडणुकीचा जो निकाल लागला, त्यानंतर आपल्याशी काही बोलावे असे वाटले. त्यासाठी हा सगळा पत्रप्रपंच...
सर्वात आधी अभिनंदन... तुम्ही काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झालात त्याबद्दल... तुम्ही गांधी घराण्याचे वारसदार आहात, त्यामुळं काँग्रेसची धुरा तुमच्या खांद्यावर आलीय, हे खरेच आहे. या पदासाठी तुमच्यापेक्षा अधिक योग्य उमेदवार तुमच्याही पक्षात असतील, हे तुम्हालाही नक्कीच ठाऊक असेल. पण तुमचे गांधी हे आडनाव आणि या नावाभोवती असलेला करिश्मा ही तुमची सर्वात मोठी जमेची बाजू आहे, हे कुणालाही विसरता येणार नाही. आपल्या देशात राजकीय घराणेशाही आहे आणि ती आनंदाने स्वीकारलीदेखील जाते, हे उघड वास्तव आहे. त्यामुळे सोनिया गांधींनंतर काँग्रेस अध्यक्षपदावर तुमचा वारसाहक्क काँग्रेसच्या यच्चयावत नेत्यांनी मान्य केला आहे.
आता पुन्हा मूळ विषयाकडे वळूया... ज्या पद्धतीने तुम्ही निवडणूक निकालांना सामोरे गेलात, दोन दोन राज्यात पराभूत झाल्यानंतरही कोणताही त्रागा किंवा वाचाळपणा केला नाहीत, ज्या धीरोदात्तपणे पराभूत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पाठीवरून कौतुकाचा हात फिरवलात, ही सगळीच प्रगल्भ नेतृत्वाची लक्षणे आहेत. जे कुणी तुम्हाला आजवर पप्पू-पप्पू म्हणून हिणवत होते... युवराज म्हणून खिल्ली उडवत आहेत, त्यांना तुम्ही घाम फोडलात. राहुल गांधी विरूद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे अख्खे केंद्रीय मंत्रिमंडळ, विविध राज्यांचे मुख्यमंत्री अशी सगळी सत्ता यांच्यातील ही लढाई होती... आणि या लढाईत केवळ 19 जागा कमी पडल्या... आणखी थोडा जोर लावला असता व राष्ट्रवादीने आघाडी केली असती तसेच मतदारांना घराबाहेर काढण्यात काँग्रेसचे कार्यकर्ते यशस्वी झाले असते तर गुजरातमधील चित्र वेगळे दिसले असते. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विजयाचा पहिला शिरपेच तुमच्या मुकुटात खोवला गेला असता... पण भाजपच्या सत्तेपुढे तुम्ही आणि तुमचा काँग्रेस पक्ष कमी पडला. पण तरीही भाजपसारखी निवडणूक प्रचार यंत्रणा नसताना एकहाती किल्ला लढवलात. टीकेचे आणि निंदा-नालस्तीचे वार समोरून होत असताना, तुम्ही पंतप्रधानपदाचा आदर राखण्याचा आटोकाट प्रयत्न केलात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'नीच' म्हणणाऱ्या मणिशंकर अय्यर यांना कसलाही विचार न करता पक्षातून तत्काळ निलंबित केलंत. नैतिकदृष्ट्या तुमची ही भूमिका कदाचित योग्य असेल, पण अटीतटीच्या निवडणुकीच्या राजकारणात असे वागणे योग्य आहे का? मणिशंकर अय्यर यांनी माफी मागितल्यानंतर त्या वादावर पडदा टाकता आला नसता का? हे 'नीच' प्रकरण योग्यरित्या हाताळले असते तर कदाचित वेगळा निकाल लागला असता का? विरोधक हॉटेलच्या चार भिंतीच्या आत काय करतात, याच्या व्हिडिओ सीडी तयार करून त्या प्रचारात उतरवणाऱ्यांकडून तुम्ही नैतिकतेची अपेक्षा बाळगता? इथे तुमच्या रक्तातील राजकीय परिपक्वता कमी पडली का?
आणखी एक... गुजरात निवडणूक पार पडल्यानंतर तुम्ही निकालाच्या दोन दिवस आधी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारलीत. हाच सगळा 'राज्याभिषेक सोहळा' गुजरात निवडणुकीच्या आधी तुम्हाला करून घेता आला नसता का? काँग्रेसचा नियोजित अध्यक्ष या नात्याने प्रचाराला उतरण्याऐवजी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून तुम्ही गुजरात निवडणुकीला सामोरे गेला असता तर...? याबाबतीत तुम्हाला भाजपवाल्यांचे क्लासेस नक्कीच लावावे लागतील. हाच जर भाजप अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम असता, तर मोठा गाजावाजा करून, तामझाम करून त्याचे दिवस-रात्र ढोल बजावण्यात त्यांनी कमी केले नसते... किंबहुना त्या माध्यमातून तुम्हाला गुजरात निवडणुकीचा प्रचारही करता आला असता... आणि निवडणूक आयोगाच्या कथित आदर्श आचारसंहितेचा भंगही झाला नसता... पण काँग्रेसचे जे कुणी धोरणी आहेत, ते या सगळ्यात कमी पडले, असे वाटते. याबाबतीत भाजपवाल्यांचा हात कुणी धरणार नाही, एवढे नक्की.
खरे सोने व पाणी दिलेले पितळ ओळखते जनता
नव्या काळा नुसार काँग्रेस बदलेले हिच अपेक्षा
Comments
Post a Comment